गुरुवार, १८ मे, २०१७

पुनश्च.

काल संध्याकाळी बँक आणि इतर कामासाठी बाहेर गेलेली माझी पत्नी घरी आली ती एका तिशीतल्या युवतीबरोबर!!

"आज ही मुक्कामाला इथे थांबणार आहे"
दरवाजा उघडायला आलेल्या मला पत्नीने  थोडक्यात ब्रिफ केलं
आणि दोघीं पत्नीच्या लेखन खोलीकडे मार्गस्थ झाल्या.
 दरवाजा बंद करून मीही सनराईझ विरुद्ध रायडर्स लावून बसलो पाहत.
इथे पाऊस नसला तरी सनराईझची फलंदाजी संपताच तिथे पाऊस सुरू होऊन मॅच थांबली.
आणि थोडा वेळ बातम्यांचे चॅनेल उडते सर्फ करून भारत सध्या कठीण कालखंडातून जात आहे आणि निदान आपण तरी त्यास जबाबदार नाही असे मनाला बजावत लवकर निद्राधीन झालो.

                          सकाळी उठून किचनमध्ये चहासाठी आलो तर तिथे वेगळेच दृश्य होते.
दोघींनी सगळे किचन आवरून स्वैपाकही करून ठेवला होता.
 त्या मुलीने " काका नमस्कार, काल तुमच्याशी दोन शब्दही बोलता आले नाहीत. कारण तुम्ही मॅच पाहत होता. आणि तुम्हाला डिस्टर्ब करणं बरोबर झालं नसतं."
 मी ही " its ok" अस म्हणून पुढे जास्त बोललो नाही.
 ती मुलगी तिचं  आवरून ' काकू मी निघते आता ' म्हणून काकूंचा आणि माझा निरोप घेऊन पुण्यास जाण्यासाठी बाहेर पडली.

                   तिला निरोप देऊन आम्ही हॉल मध्ये येऊन बसलो.
 पत्नीने मी न विचारताच " गानु शेठ, या मुलीची कथा तुम्हाला सांगितली पाहिजे " अशी प्रस्तावना करून जे काही सांगितलं ते असं ...

  पुण्याला पत्नीच्या मावसबहिणी शेजारी राहणारे एक ( कदम हे आडनाव देऊया आपण त्यांना ) उच्चभ्रू मराठा कुटुंब.
त्या मुलीच्या आईचे आणि सौ. गानु यांचे सख्य.
कारण साहित्य व लेखनाची आवड.
या मुलीचे लग्न चांगले घराणे पाहून वयाच्या 22 व्या वर्षीच आई वडिलांनी करून दिलेले.
 लग्न झाल्यावर काही दिवसातच कळले की त्या मुलाचे पहिले लग्न झालेले आहे.
त्याची बायको छळवादामुळेच यांच्याजवळ राहत नाही.
तिला एक चार वर्षाचा मुलगाही आहे.
 ...कदमांची मुलगी घरी परत आली.
 काही इलाजच नव्हता.
कारण असा उसना प्रपंच करणं , आणि तोही आयुष्यभर?
केवळ दुरापास्त.
 मग ही मुलगी घरी रडत बसली नाही.
नोकरी करून  शेतकी कॉलेजातील राहिलेली दोन वर्षे तिने पुरी केली.
 B.Sc. (Agri.) झाली तेही विशेष नैपुण्यात (distinction).

आज त्या मुलीचं वय 29 आहे.
 आता तिला मिळालेली नोकरीही गुणवत्तेनुसार चांगल्या वेतनाची मिळालीय.
तरीही स्मार्ट, निगर्वी आणि कामसू असलेली ही मुलगी जीवनात अधिक यश मिळवण्यासाठी उत्सुक आहे.
मागे काय घडलं याबद्दल खंत न बाळगता तिने आयुष्य पुन्हा योग्य चाकोरीवर आणून ठेवलंय.

काल तिला कॅज्युअली घेणारा मी आज तिची माहिती कळल्यावर निश्चितच प्रभावित झालो आहे.
 कुठल्याही समाजाला मार्गदर्शन करण्याची माझी लायकी अगर कुवत नाही.
पण जे घडलंय, आपल्याला कळलंय ते चार जणांपुढे गेलं पाहिजे यासाठी हे लिहिलंय.
 बाकी सूज्ञ तर तुम्ही आम्ही सगळेच असतोय.

मंगळवार, १६ मे, २०१७

राजगुरूनगर ... राजगुरूनगर !!!

*राजगुरूनगर*
आमच्या गावाचं नाव खेड होतं हो.
जुनी लोकं हे गाव खूप जुन्या काळापासून वसलेलं म्हणून सांगायची.
खेटक ग्राम असा उल्लेखही केला जायचा शिवकाळाच्याही आधीपासून.
गावाबाहेरच्या ओढ्यावर घातलेला घडीव दगडाचा बांध " दिलावर धरण " म्हणून ओळखला जायचा.
24 वाड्यावस्त्या असणारं हे गाव जसं भिकार नव्हतं तसं समृद्धही नव्हतं फारसं.
 जेऊनखावून सुखी असणारी आणि स्वभावतःच गरजा कमी असणारी माणसं असेल त्या परिस्थितीत पण समाधानानं राहत होती.
 शेजारी चांगल्यापैकी व्यापार उदीम असणारी चाकण, मंचर, नारायणगाव सारखी गावं होती.
पण आमचं गाव तसही नावाजलेलं नव्हतं.
तालुक्याचं गाव म्हणून कोर्टकचेऱ्या आणि मुद्द्याची सरकारी कार्यालयं होती हे वैशिष्ठय.

... गावातल्या मारुतीच्या देवळात एक अवलिया कीर्तनकार मनात इथं सप्ताहभर कीर्तन करायचं ठरवूनच मुक्कामी आला.
गावातल्या, वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र बोलावून त्याचा विचार त्याने त्यांच्यापुढे मांडला.
गाव पुढारी आनंदाने तयार झाले.
तसाही टुरिंग टॉकीज सोडली तर करमणुकीच्या दृष्टीने आनंदच होता. नाही म्हणायला यात्रा जत्रेत होणारे तमाशे फारतर.

कीर्तने सुरू झाली.
पण या बाबाची कीर्तने वेगळीच होती.
नुसतच विट्ठल विठ्ठल नाही तर त्याबरोबर धर्मवीर संभाजी, नेताजी सुभाष बाबू, चंद्रशेखर आझाद, नाना पाटील यांची आख्याने रंगू लागली.
एरवी कीर्तन म्हटलं की रात्रीची डुलक्या घेत, पेंगत बसणारी मंडळी या अख्यानांमध्ये सरसावून मांड्या घालून ताठ बसून लक्ष देऊन ऐकू लागली.

बोल बोल म्हणता सात दिवस निघून गेले.
शेवटच्या दिवशी भगतसिंग, सुखदेव, आणि राजगुरू या तीन क्रांतिकारकांच्या बलिदानाचा विषय त्याने फारच बहारीचा रंगवला.
सँडर्सला राजगुरू गोळ्या घालतो तो प्रसंग म्हणजे त्या किर्तनकाराच्या अभिनय संपन्नतेचा उत्कट अविष्कार होता.
कीर्तन संपवताना किर्तनकाराने जमलेल्या सर्व नागरिकांना खडा सवाल टाकला.
" स्वातंत्र्याच्या वेदीवर आपले शिरकमल वाहणारा पट्ठ्या हुतात्मा शिवराम राजगुरू तुमच्या गावात जन्म घेतलेला. आणि तुमच्या गावाचं नाव खेड व्हय? अरे थूत या जिंदगीवर!! आता हे गाव राजगुरूनगरच व्हायला हवं. "

झालं,
 अख्खी तरुणाई त्या प्रवचनकाराबरोबर गोळा झाली.
त्या सप्ताहानंतर लगोलग काही दिवसातच गाड्या भरून मंडळी मुंबईला मंत्रालयात गेली.
पंचक्रोशीतले पुढारी , आमदार, खासदार, गावातल्या वजनदार असामी सगळे वेठीला धरले.
सगळ्या गावाने एकमतानेच मनावर घेतले.
आणि शासनानेही आवश्यक त्या पूर्तता करून खेड हे नाव पुसून गावाला राजगुरूनगर हे अभिमानास्पद नाव दिले.
 यथावकाश गॅझेटमध्येही त्याची नोंद झाली.
इथं महत्वाचं सांगायचं म्हणजे चांगली गोष्ट होणं ही चांगलीच बाब असते. सर्वानाही ते व्हावं असं वाटत असतं.
पण कोणीतरी योजक असावा लागतो.
*योजकस्तत्रदुर्लभः हे उगीचच बनलेलं सुभाषित नाहीये!!
***************************************
तळ टीप :-. काही मित्रांनी ह्या पोस्टमध्ये वर्णन केलेले कीर्तनकार कोण अशी पृच्छा केली. मला तर नाव काही केल्या आठवत नव्हते. पण ते कीर्तनकार रामदासी संप्रदायाचे होते हेच लक्षात होते. त्यावेळी बाई दीक्षित यांच्याकडे गीता जयंतीस येणारे अनंतदास रामदासी (उपाख्य, धेनुदास डोळे ) हेच त्यावेळी मारुती मंदिरात कीर्तन केलेले रामदासी कीर्तनकार हे नक्की झाले.
*************************************************